वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची मशाल तेवत ठेवणारे कवी-गायक, व्याख्याते, समाजप्रबोधनकार, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विजय दामू मोकळे करंजगावकर यांचा आज, १४ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मूळचे करंजगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील विजय मोकळे यांनी कवी, गायक, व्याख्याते आणि समाजप्रबोधनकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनतेत ते प्रेमाने ‘शाहीर विजय मोकळे करंजगावकर’ म्हणून ओळखले जातात.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करताना त्यांनी कधीही आपल्या ध्येयाची साथ सोडली नाही. अडचणींचे डोंगर पार करताना शब्द, कविता, गीत आणि शाहिरी यांच्याशी असलेले नाते त्यांनी कायम जपले. समाजप्रबोधन आणि समाजकार्याची वाटचालही त्यांनी तितक्याच निष्ठेने सुरू ठेवली. या प्रवासात त्यांच्या अर्धांगिनी कमल विजय मोकळे तसेच बंधू राजू मोकळे आणि रवींद्र मोकळे यांची खंबीर साथ लाभली.
वडिलांकडून मिळाले समाजप्रबोधनाचे संस्कार
विजय मोकळे यांचे शिक्षण वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात बी.ए.पर्यंत झाले. शालेय जीवनापासूनच गीतगायन, संगीत आणि कवितेची त्यांना विशेष आवड होती. त्यांचे वडील स्मृतीशेष दामू तुकाराम मोकळे हे रेल्वेत गेटमन म्हणून कार्यरत असतानाच वैजापूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. वडिलांकडून मिळालेल्या समाजप्रबोधनाच्या संस्कारांनी विजय मोकळे यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा दिली.
शाहू-फुले-आंबेडकर विचार, सामाजिक समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दोनशेहून अधिक समाजप्रबोधनपर कार्यक्रम केले आहेत.
गीत, कविता आणि शाहिरीतून समाजजागृती
भीमगीते, लोकगीते, राष्ट्रभक्तीपर आणि समाजप्रबोधनपर गीतलेखनातून त्यांनी आपली साहित्यिक व कलात्मक ओळख निर्माण केली. त्यांच्या अनेक रचना महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी सादर केल्या आहेत. त्यांनी लिहिलेली आणि गायलेली भीमगीते, शिवगीते तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी गीते ‘विजय मोकळे करंजगावकर ऑफिशियल’ या YouTube माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचत आहेत.
साहित्य, शाहिरी, सामाजिक कार्य आणि समाजप्रबोधनाच्या योगदानाची दखल घेत त्यांना शाहिरी पुरस्कार, राष्ट्रीय दर्पण पुरस्कार, महाकवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान पुरस्कार यांसह विविध साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
‘काळजातल्या कविता – भाग १’ लवकरच रसिकांच्या भेटीला
विजय मोकळे यांचा पहिला कवितासंग्रह ‘काळजातल्या कविता – भाग १’ लवकरच प्रकाशित होत आहे. जीवनसंघर्ष, मानवी संवेदना, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, माणुसकी आणि सामाजिक परिवर्तनाची आस या विविध भावविश्वांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये उमटते. त्यामुळे या कवितासंग्रहाची साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
५७७ घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रभावी पाठपुरावा
सामाजिक कार्यकर्ते म्हणून विजय मोकळे यांनी वैजापूर तालुक्यातील सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. सन २०२४-२५ मधील रमाई आवास योजनेचा प्रश्न तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रश्नासाठी त्यांनी निवेदने देत संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला.
समाजकल्याण आयुक्त दीपक खरात तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री लोकनेते संजयजी शिरसाट यांच्याकडे त्यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून ५७७ घरकुलांना मंजुरी मिळाली.
विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेसाठीही लढा
गोरगरीब विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या स्वाधार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रश्नासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ऑनलाइन अर्जाची मुदत वाढविणे, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारणे यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली.
याशिवाय वैजापूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या पाच ब्रास वाळूच्या प्रश्नासाठीही त्यांनी प्राधान्याने पाठपुरावा केला.
‘जनतेचा प्रश्न म्हणजे माझा प्रश्न’ या भावनेतून कार्य
एखादा नागरिक प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आला की तो प्रश्न आपला समजून त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे, ही विजय मोकळे यांची कार्यपद्धती आहे. सामाजिक कार्य करताना पक्षीय राजकारणापेक्षा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काम केले आहे.
‘दिलदार मित्र आणि सच्चा सामाजिक कार्यकर्ता’
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल यांनी विजय मोकळे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढताना सांगितले की, विजय मोकळे हे लहानपणापासूनच आंबेडकरी चळवळीशी जोडलेले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची त्यांना लहानपणापासूनच विशेष आवड होती आणि चळवळीचे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले.
एक दिलदार मित्र, सच्चा सामाजिक कार्यकर्ता आणि मनमिळाऊ स्वभावाचा कवी, गायक, सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार म्हणून विजय मोकळे यांची ओळख आहे. विविध सामाजिक उपक्रमांबाबत ते कायम सल्लामसलत करत असल्याचेही बागुल यांनी नमूद केले.
कलेची संवेदना, समाजकार्याची तळमळ, पत्रकारितेची लेखणी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची जिद्द यांचा सुंदर संगम म्हणजे शाहीर विजय दामू मोकळे करंजगावकर!
अशा या अवलिया कवी-गायक, व्याख्याते, समाजप्रबोधनकार, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विजय दामू मोकळे करंजगावकर यांना वाढदिवसानिमित्त निरोगी, आनंदी, यशस्वी आणि दीर्घायुषी जीवनासाठी लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या हातून समाजसेवेचे, साहित्याचे, कलेचे आणि समाजप्रबोधनाचे कार्य यापुढेही अविरतपणे घडत राहो, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची त्यांची धडपड अधिक बळकट होवो आणि त्यांच्या लेखणीला, कंठाला व कार्याला नवनवीन यश लाभो, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा!
