कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६ (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर, राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, १५ ऑगस्ट रोजी संत तुकाराम नगर येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शहरातील हजारो देशप्रेमी नागरिक, कामगार, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी व्हावेत, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.
रॅलीची सुरुवात दुपारी ३ वाजता संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून होणार आहे. गंगानगर, महेशनगर, ॲटलॉस कॉलनी, डी.वाय. पाटील हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल या मार्गाने रॅलीचा प्रवास होणार असून, आचार्य अत्रे रंगमंदिर मार्गे पुन्हा रॅली सभास्थळी दाखल होईल. सुमारे तीन किलोमीटरचा हा तिरंगा प्रवास असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत रॅलीची सांगता होऊन त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीसाठी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगताप, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद सदस्य उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रविजी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेकजी बारणे, गटनेते प्रशांतजी शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो भारताच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. हा तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आणि हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आणि राष्ट्राप्रती आपले कर्तव्य बजावणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.”
“राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयावर गेल्या ३० वर्षांपासून १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जाते. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा संदेश अधिक व्यापकपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी-चिंचवड ही कामगारांची नगरी आहे. त्यामुळे या कामगारनगरीचे नागरिक तिरंग्याच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या रॅलीत एक हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा असून, रॅलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनालाही माहिती देण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा दिवस केवळ मनोरंजनासाठी न घालवता देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या तिरंग्याला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन भोसले यांनी केले.
“ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांचे स्मरण करूया; तिरंग्याला अभिवादन करून राष्ट्रभक्तीचा जागर करूया. पिंपरी-चिंचवडच्या कामगारनगरीतून देशप्रेमाचा बुलंद संदेश देण्यासाठी शेकडो कामगार, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिकांनी या तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे,”
…….. यशवंतभाऊ भोसले, कामगार नेते
