निगडी | प्रतिनिधी…… पिंपरी चिंचवड शहरातील निगडी गावठाण परिसरातील मारुती मंदिर ते यमुनानगर येथील बोल्हाई माता मंदिर या मार्गावर शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावर काही वाहनचालकांकडून विद्यार्थिनींची छेडछाड, मोठ्याने हॉर्न वाजवून दहशत निर्माण करणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे तसेच विद्यार्थिनींच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करण्यासारखे प्रकार होत असल्याच्या तक्रारी वाढल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर काळभोर यांनी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची भेट घेऊन निवेदन साद केले. संबंधित परिसरात शालेय वेळेत दामिनी पथकाची नियमित गस्त वाढविण्यासह आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, प्रसन्नपुरम बिल्डिंग कॉर्नर ते यमुनानगर कॉर्नर या मार्गावरून माता अमृतानंदी शाळा, मॉडर्न शाळा आणि एस.पी.एम. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. याच मार्गावर काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, भरधाव वेगाने वाहने चालवणे, विद्यार्थिनींना घाबरवणे आणि त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारांमुळे विद्यार्थिनी तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत दामिनी पथकाची नियमित गस्त, पोलिसांची उपस्थिती आणि संशयित वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, या परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख वाढवून रोड रोमिओ तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही सचिन काळभोर यांनी केली आहे.
‘विद्यार्थिनींची सुरक्षितता ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. तक्रारींची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे,’ असे काळभोर यांनी सांगितले.