राहुरी फॅक्टरीतील पंचर व्यावसायिकाचे दुकान खोदकामामुळे झाले ‘बेट’; तातडीच्या मदतीची मागणी
राहुरी फॅक्टर,प्रतिनिधी. ज्ञानेश्वर बनसोडे.दिं.२६ जुलै : नगर-मनमाड महामार्गावरील रस्ता व पूल बांधकामामुळे रस्त्यालगतच्या लहान व्यावसायिकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होत असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विकासकामांमुळे ग्राहकांचा संपर्क तुटल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
राहुरी फॅक्टरी येथील सतीश पांडुरंग साळवे हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून महामार्गालगत पंचर दुरुस्तीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या खोदकामामुळे त्यांचे दुकान चारही बाजूंनी खड्ड्यांनी वेढले गेले असून ते अक्षरशः ‘बेट’ बनले आहे. दुकानापर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक नसल्याने ग्राहक येऊ शकत नाहीत.
याबाबत सतीश साळवे म्हणाले, “आम्ही अतिशय गरीब कुटुंब आहोत. दिवसभर दुकानात बसूनही एकही ग्राहक येत नाही. खोदकामामुळे धूळ, चिखल आणि अपघाताचा धोका वाढला आहे. हाताला काम नसल्याने घर चालवणे कठीण झाले असून उपासमारीची वेळ आली आहे.”
महामार्गाचे काम वेगाने सुरू असले तरी अशा लहान व्यावसायिकांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रभावित व्यावसायिकांना तात्पुरता रस्ता उपलब्ध करून देणे, पर्यायी जागेची व्यवस्था करणे किंवा योग्य नुकसानभरपाई देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
विकासकामे महत्त्वाची असली तरी त्याचा फटका गरीब आणि छोट्या व्यावसायिकांना बसू नये, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. अन्यथा विकासाच्या प्रक्रियेत अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
