वैजापूर | प्रतिनिधी : (विजयकुमार मोकळे)….नीट, सीईटीसह विविध स्पर्धा परीक्षांतील कथित पेपरफुटीच्या घटनांचा निषेध आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारने कथित दडपशाही केल्याच्या आरोपाच्या निषेधार्थ वैजापूर शहरात सोमवारी (दि. 20 जुलै) आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंबेडकरवादी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती, वैजापूर शहर व ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहभागाने हा मोर्चा पार पडला.
मोर्चाची सुरुवात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी, स्पर्धा परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा कथित खेळ तातडीने थांबवावा, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील कथित दडपशाहीचाही निषेध व्यक्त करण्यात आला.
यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण न्हावड यांना सादर केले.
या मोर्चात बाबासाहेब पगारे, सखाराम शिनगारे, राजेंद्र बागुल, कवी-गायक शाहीर विजय मोकळे करंजगावकर, प्रशांत त्रिभुवन, संजय पगारे, सिद्धार्थ बागुल, राहुल संत, जुबेर चाऊस, प्रा. डॉ. आबासाहेब कसबे, सागर सोनवणे, बुद्धभूषण साळवे, साहेबराव पडवळ, जीवन पठारे, श्रीकांत जाधव, भीमराव महाले, राहुल साळवे, नामदेव त्रिभुवन यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
