चिंचवड, दि. १४ जुलै २०२६ : अनुसूचित जातींमध्ये लोकसंख्येनुसार मातंग समाजाचे ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरण तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मातंग समाजातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन सादर करून शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना युवराज दाखले यांनी सांगितले की, मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी उप-वर्गीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे. शंकरभाऊ तालिके यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू असून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनीही महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व पोटजातींना न्याय मिळण्यासाठी उप-वर्गीकरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. पंजाब, तमिळनाडूसह काही राज्यांमध्ये अशा प्रकारची अंमलबजावणी झाली असून महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गठित केलेल्या बीदर समितीचा अहवाल सादर झाला आहे. त्यामुळे त्याआधारे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
निवेदनामध्ये सोशल मीडियावर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह टीका-टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, ‘आर्टी’ (ARTI)चे मुख्य कार्यालय हाप्किन महामंडळाच्या पाच एकर जागेवर उभारावे, २०१२ मध्ये मंजूर झालेल्या ठरावानुसार संबंधित जागा हस्तांतरित करावी, पिंपरी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात धमकी देणाऱ्यांवर तातडीने अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्यांचाही समावेश होता.
तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या राज्य शासन आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दाखले यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उप-वर्गीकरणाबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन शासन आदेश जारी करावा, अशी मागणी आंदोलनात सहभागी शेकडो पदाधिकाऱ्यांनी केली.
आंदोलनापूर्वी निगडी येथील मधुकर पवळे पुलाजवळ असलेल्या महाराणा प्रताप आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या आंदोलनात हिंदू मातंग एकता सेना, शिवशाही शासन पक्षासह विविध संघटनांचे शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. युवराज दाखले यांनी नायब तहसीलदारांना सर्व मागण्या सविस्तरपणे मांडल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
