५० हजारांहून अधिक समाजबांधवांचा सहभाग
लातूर | प्रतिनिधी : मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अ-ब-क-ड उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर भव्य महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ५० हजारांहून अधिक समाजबांधव सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला.
महामोर्चाची सुरुवात शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा हिंदू मातंग सेना मुख्य प्रवक्ते व कार्यकारी प्रमुख लोकसेवक युवराज दाखले आणि अखिल भारतीय मातंग संघाचे ज्येष्ठ नेते नामदेव रिट्टे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी बोलताना लोकसेवक युवराज दाखले यांनी मोर्चा शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच सर्व समाजबांधवांचे आभार मानले. तसेच सामाजिक सलोखा राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र राज्य मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.
या महामोर्चात शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे, अखिल भारतीय मातंग संघाचे ज्येष्ठ नेते नामदेव रिट्टे, नानासाहेब रोखडे, चंद्रकांत शिंदे, नामदेव खवळे, शहीद संजय ताकतोडे यांचे बंधू हनुमंत ताकतोडे, धनंजय ढावरे, संतोष कांबळे, बाबासाहेब रसाळ यांच्यासह विविध संघटनांचे शेकडो पदाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड शहरातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
