पुणे प्रतिनिधी : पुणे शहर हे भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख हब बनणार असून, सन २०३० पर्यंत देशातील सर्वाधिक आधुनिक शहर आणि विकासाचे प्रमुख ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे–शिरूर, तळेगाव–चाकण–शिक्रापूर आणि हडपसर–यवत या तीन महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुणे–शिरूर, तळेगाव–चाकण–शिक्रापूर आणि हडपसर–यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांना गती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
या नाविन्यपूर्ण प्रकल्पांमधून शासनाला अनुक्रमे ५०० कोटी, ३०० कोटी आणि १५० कोटी रुपये असा एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीचा विचार करून या तिन्ही उन्नत मार्गांवर पुढील काळात मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्यामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होऊन शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
