पुणे (आळंदी) प्रतिनिधी……आळंदी शहरात इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडीवळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी, नदीकाठच्या सिद्धबेट, गोपाळपुरा परिसरातील धर्मशाळांमध्ये पाणी शिरले असून शहरातील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत.
या परिस्थितीमुळे आळंदीचा बाह्य संपर्क पूर्णपणे तुटला असून सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुलांचे कठडे तसेच नदीकाठावरील चेंजिंग रूमही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
पूरामुळे विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे २५० ते ४०८ वारकऱ्यांना आपत्कालीन यंत्रणांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच, काही नागरिकांच्या सुटकेचे प्रयत्नही युद्धपातळीवर सुरू आहेत.
आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर मानली जात आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत येत असतात. मात्र, पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीकडे न येण्याचे आवाहन केले असून, जिथे आहात तिथेच सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि धर्मशाळांसह दहा इमारती तात्पुरत्या निवासासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दोन दिवसांसाठी वारकऱ्यांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यासाठी ६ जुलै २०२६ रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर देहू-आळंदी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था करणे शक्य नसल्याने, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत पार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
