‘नदी सुशोभीकरण नव्हे, आधी एसटीपी प्रकल्प उभारा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, उद्घाटन टाळण्याचे आवाहन
आळंदी, दि. ८ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदी वॉटर बॉडी (सरोवर) पुनर्जीवन प्रकल्पाविरोधात जनजागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे सुमारे ४४३.५१ कोटी रुपयांच्या इंद्रायणी नदी पुनर्जीवन प्रकल्पाला तातडीने स्थगिती देऊन संपूर्ण प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात भापकर यांनी पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांवरील नदी पुनर्जीवन प्रकल्पांवर हजारो कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे नमूद केले आहे. या प्रकल्पांमुळे नद्यांचे नैसर्गिक स्वरूप, जैवविविधता आणि नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात येणार असून हजारो वृक्षांची कत्तल होण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला.
भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पांच्या डीपीआरमध्ये पूरस्थिती कमी होण्याचा ठोस दावा नसून, नदी शुद्धीकरणापेक्षा सुशोभीकरण आणि सिव्हिल कामांवर अधिक भर देण्यात आला आहे. दुसरीकडे शहरात आवश्यक क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडले जात असल्याने प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये नदी सुशोभीकरणावर खर्च करण्याऐवजी एसटीपी प्रकल्पांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
निवेदनात इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवरही गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या नियमित विषयपत्रिकेत विषय नसताना ऐनवेळी विषय समाविष्ट करून घाईघाईने मंजुरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आठ निविदांपैकी पाच महाराष्ट्रातील ठेकेदारांना अपात्र ठरवून गुजरातमधील कंपनीची निविदा मंजूर करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
आळंदी, देहू आणि चिंचवडगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यास हरकत नसली, तरी संपूर्ण नदीपात्राचे काँक्रीटीकरण किंवा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करणे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
दरम्यान, आज आळंदी येथे झालेल्या जनजागृती आंदोलनात शुभम पांडे, नरेंद्रजी चुय, संतोष वाळके, विशाल भालेराव, संदीप बले यांच्यासह अनेक वारकरी सहभागी झाले. या आंदोलनाला उपस्थित वारकऱ्यांनी पाठिंबा दर्शविल्याचा दावा मारुती भापकर यांनी केला.
आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारने इंद्रायणी नदी वॉटर बॉडी पुनर्जीवन प्रकल्पाला स्थगिती देऊन त्याचा पुनर्विचार करावा तसेच इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांच्या उगमापासून संगमापर्यंत प्रभावी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावेत, अशी मागणी केली आहे.
