स्व.अजितदादांच्या आठवणींनी वारीत दाटला भावनांचा पूर; विश्रांतवाडीत वारकऱ्यांच्या सेवेत सुनील टिंगरे
पुणे | प्रतिनिधी……“एवढाच निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला…!” या भावनिक शब्दांनी विश्रांतवाडी परिसरात माऊलींच्या पालखी स्वागत सोहळ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले. स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतरच्या पहिल्याच आषाढी वारीत त्यांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा वडगावशेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले. वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, अल्पोपहार व अन्य आवश्यक सेवांची व्यवस्था करून त्यांनी सेवाभावाची परंपरा जपली.
स्व. अजितदादा पवार यांचा वारकऱ्यांशी असलेला जिव्हाळा, वारीबद्दलची त्यांची आस्था आणि समाजसेवेची त्यांची ओळख यांची आठवण यावेळी अनेकांनी काढली. त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली.
भक्तिमय वातावरणात “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला, तर स्व. अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करत अनेक कार्यकर्त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. श्रद्धा, सेवा आणि स्मृती यांचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला.
