निगडीत ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ सोहळा; आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मान
पिंपरी, दि.२९ : २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या स्मृतिदिनानिमित्त निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करणाऱ्या आणि मिसा (MISA) कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांनी आणीबाणीच्या काळातील संघर्षाचा इतिहास उलगडत कार्यकर्त्यांना लोकशाही रक्षणासाठी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन केले. “भारतीय जनता पक्षाचा उदय हा आणीबाणीच्या काळातील संघर्षातून झाला असून ‘संघर्ष’ हाच आमच्या पक्षाचा डीएनए आहे. इतिहास केवळ वाचण्याचा नसून तो हृदयाने समजून घेण्याचा असतो,” असे ते म्हणाले. लोकशाहीसाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण ठेवत संघटनात्मक समन्वय वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आणीबाणीचा उल्लेख भारतीय लोकशाहीवरील सर्वात काळा अध्याय म्हणून केला. त्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले, अनेक राष्ट्रभक्तांनी तुरुंगवास आणि अमानुष छळ सहन केला, मात्र हुकूमशाहीपुढे झुकले नाहीत. त्यांच्या त्यागामुळेच आज देशात लोकशाही बळकट असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते ज्येष्ठ सत्याग्रहींना ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अनेकांच्या भावना अनावर झाल्या.
या कार्यक्रमास आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनीताई जगताप, संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, अभिषेक बारणे, सदाशिव खाडे, मधू जोशी, आबा खांबे, डॉ. बाळकृष्ण नाईक, दिनेश यादव, सुजाता पालांडे, डॉ. गीता आफळे यांच्यासह विविध आघाड्या व मोर्चांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, शक्तिकेंद्र व बूथ प्रमुख तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शत्रुघ्न काटे यांनी केले. सूत्रसंचालन देवदत्त भिंगारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संयोजक मोरेश्वर शेडगे यांनी मानले.
