भरधाव कार दुभाजक ओलांडून आयशर ट्रकवर आदळली; दोघे गंभीर जखमी, मावळ परिसरावर शोककळा
सातारा,शिरवळ प्रतिनिधी, पिंपरी : पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीत बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव टाटा नेक्सॉन कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे (१९, तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, टाकवे) आणि निखिल बाळू राऊत (२०, कामशेत) यांचा मृत्यू झाला. तर दीक्षित दयानंद पुजारी (२०, कामशेत) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०, बहुर, कामशेत) हे गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, टाटा नेक्सॉन (एम एच१४ एलजे ३०३३) ही कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर कार आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार प्रथम दुभाजकाला धडकली आणि पलटी होत थेट विरुद्ध दिशेच्या सातारा–पुणे लेनमध्ये जाऊन पडली.
याचवेळी समोरून येणाऱ्या आयशर ट्रक (के ए २७ सी ५८७८) सोबत कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यातील चार तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
एकाच कारमधील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मावळ परिसरासह मृतांच्या गावांवर शोककळा पसरली आहे. तरुण वयात चार कुटुंबांवर कोसळलेल्या या दुःखद आघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मावळ परिसरावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या अपघाताप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्याकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अपघाताचे नेमके कारण आणि वाहनाचा वेग याबाबत तपास केला जात आहे.
