“जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिस्त यांच्या बळावरच यश संपादन करता येते.” – सौ. अन्नपूर्णा राव
पुणे (बेल्हे)प्रतिनिधी,संदीप शितोळे : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल येथे सीबीएसई दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी आयोजित या सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून समर्थ गुरुकुलच्या माजी प्राचार्या सौ. अन्नपूर्णा राव उपस्थित होत्या. यावेळी कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे तसेच सखाराम मातेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. अन्नपूर्णा राव म्हणाल्या, “जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिस्त यांच्या बळावरच यश संपादन करता येते.” विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून आत्मविश्वास, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करून त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. अनेक विद्यार्थी व पालकांनी समर्थ गुरुकुलच्या दर्जेदार शिक्षणपद्धती, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, संस्कारक्षम वातावरण आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील अभिमान यामुळे संपूर्ण परिसर प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समृद्ध परंपरा समर्थ गुरुकुलने पुन्हा एकदा अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे नियोजन प्रिया कडूसकर, सुकन्या हिंगे, वैशाली सहाणे आणि स्नेहल ढोले यांनी केले. सूत्रसंचालन रामचंद्र मते यांनी केले, तर दीपाली नवले यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
