पुणे/वाकड प्रतिनिधी : वाकड परिसरातील स्टार बाजारच्या दोन शाखांमधून गोवर्धन तूप/घी पाऊच, बदाम-काजू पाऊच तसेच इतर किराणा वस्तू असा एकूण ४२ हजार १०० रुपये किमतीचा माल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन पुरुष व चार महिलांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता दत्त मंदिर रोड, वाकड येथील वशवन बिल्डिंगमधील स्टार बाजार येथे चोरीची घटना घडली. तसेच १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता कलाटे वस्ती येथील स्टार बाजारमध्येही अशाच प्रकारे चोरी करण्यात आली.
या दोन्ही घटनांमध्ये तीन ते चार अनोळखी महिला आणि तीन पुरुष ऑटो रिक्षाने स्टार बाजारमध्ये आले. त्यांनी दुकानातील गोवर्धन घी/तूप पाऊच, बदाम-काजू पाऊच तसेच अन्य वस्तू चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत ४२,१०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संशयितांमध्ये अंदाजे २५ ते ५५ वर्षे वयोगटातील चार महिलांचा समावेश असून, त्यापैकी एका महिलेने निळसर रंगाची ओढणी व विटकरी रंगाची कुर्ती, दुसरीने निळसर जिन्स व पांढरा स्वेटशर्ट, तिसरीने गुलाबी पंजाबी ड्रेस व पांढरी ओढणी, तर चौथ्या महिलेने आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस व लाल रंगाची ओढणी परिधान केली होती. तसेच अंदाजे २५ वर्षे वयोगटातील पुरुष निळसर रंगाची पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा चटापट्या डिझाइनचा शर्ट परिधान केलेला असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी सचिन पंडित बाघमारे (वय ३९, रा. सर्वे नं. १३, घिटे नगर, भोसरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि दराडे करीत असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.