दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन
बुलढाणा प्रतिनिधी | नांदुरा….महाराष्ट्र शासन आणि एस.टी. प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी एनसीएमसी (NCMC) कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात टप्प्याटप्प्याने हजारो लाभार्थ्यांना एनसीएमसी कार्ड वितरित करण्यात आले असून, या कार्डच्या माध्यमातून पात्र प्रवाशांना एस.टी. प्रवासातील विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे.
अमृत नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, दिव्यांग प्रवाशांना ७५ टक्के सवलत, तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत १२ वर्षांवरील मुली व महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येत आहे.
यापूर्वी आधारकार्ड किंवा इतर कागदपत्रांच्या आधारे प्रवास सवलत दिली जात होती. मात्र, या प्रक्रियेत गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी एनसीएमसी कार्ड काढून घेणे आवश्यक आहे.
दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही!
एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्याबाबत आदेश झाल्यानंतर ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक प्रवाशांमध्ये या कार्डबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः मोबाईल रिचार्जप्रमाणे दर महिन्याला एनसीएमसी कार्डमध्ये पैसे भरावे लागतात, अन्यथा कार्ड बंद होईल, असा गैरसमज नागरिकांमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे.
मात्र, हा समज चुकीचा असून एनसीएमसी कार्ड दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही. एस.टी. बसने प्रवास करायचा असेल, तेव्हाच कार्डमध्ये आवश्यक रक्कम जमा करता येणार आहे. कार्डमध्ये उपलब्ध असलेल्या शिल्लक रकमेच्या आधारे प्रवास करता येईल. त्यामुळे सवलतधारक प्रवाशांनी दर महिन्याला कार्ड रिचार्ज करण्याची चिंता करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बसस्थानकांसह प्रवासादरम्यानही रक्कम भरण्याची सुविधा
एनसीएमसी कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी संबंधित अधिकृत केंद्रांची सुविधा बसस्थानकाच्या आतील व बाहेरील भागात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रवासादरम्यान वेळ मिळाल्यास एस.टी. वाहकांकडूनही कार्डमध्ये रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एनसीएमसी कार्ड प्रणालीमुळे चिल्लर पैशांवरून होणारे दैनंदिन वाद टाळण्यास, तसेच अनधिकृत अथवा गैरमार्गाने प्रवास करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यास मदत होणार असल्याचे एस.टी. प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वाहकांशी सौजन्याने वागण्याचे आवाहन
एस.टी. प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्डच्या वापराबाबत वाहकांसोबत हुज्जत न घालता प्रवाशांनी सहकार्य करावे. कार्डसंदर्भात कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास जवळच्या एस.टी. बसस्थानकावर जाऊन आवश्यक माहिती घ्यावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
“एनसीएमसी कार्ड म्हणजे दर महिन्याला रिचार्ज करावे लागणारे मोबाईल रिचार्ज नाही. प्रवासाची गरज असेल तेव्हाच कार्डमध्ये रक्कम जमा करता येते. त्यामुळे नागरिकांनी कोणताही गैरसमज न ठेवता लवकरात लवकर एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे आणि शासनाच्या एस.टी. प्रवास सवलतींचा लाभ घ्यावा,” असे आवाहन नांदुरा बसस्थानक, बुलढाणा विभागाचे वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींशी बोलताना केले.
एनसीएमसी कार्डबाबतचा संभ्रम दूर झाल्यास प्रवाशांना सवलतींचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून, एस.टी. प्रशासनाच्या या उपक्रमाला प्रवाशांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
