पुणे,रावेत प्रतिनिधी …..रावेत परिसरातील किवळे येथे किराणा दुकान चालविणाऱ्या व्यावसायिकाकडून दुकान सुरू ठेवण्यासाठी ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणी न दिल्यास दुकान चालू देणार नाही तसेच “बघून घेऊ” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशापुरा सुपर मार्केट, किवळे येथे ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी पांडुरंग तुकाराम साळुंखे (वय ३२) आणि पवन अभिमान पोळ यांनी फिर्यादी देवाराम हेमाराम न्हावी (वय ३३, व्यवसाय किराणा दुकान) यांच्याकडे एकूण ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीकडून ३ हजार ५०० रुपये रोख स्वरूपात, तर १ हजार ५०० रुपये पेटीएमद्वारे ऑनलाइन स्वीकारल्याचा आरोप पोलिसांनी नोंदविला आहे. त्यानंतर फिर्यादीने रावेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २८५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८(३), ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच संबंधित भादंवि कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
गुन्हा १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३७ वाजता दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे व सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.