देहूरोड, प्रतिनिधी : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजप्रबोधन, राष्ट्रप्रेम, साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा जपणाऱ्या या दोन महान विभूतींना मान्यवरांनी अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॲड. कैलास पानसरे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर उपस्थित मान्यवरांनीही दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजकारण आणि परिवर्तनवादी विचारांचा गौरव केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या लेखणीतून उपेक्षित, वंचित आणि श्रमिक समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडत मराठी साहित्यविश्वात अजरामर स्थान निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन “वाचन-लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित केल्याचा उल्लेख करत नव्या पिढीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून सामाजिक जाणीवा अधिक दृढ कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॲड. कैलास पानसरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करत स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात जनजागृती केली तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज संघटित करून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केल्याचे त्यांनी सांगितले.
कैलास वानखेडे यांनीही लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी टिळकांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक कोमल माने, पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार वाव्हळे, अतुल मराठे, लहू मामा शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, प्रवीण झेंडे, महावीर बरलोटा, मदन सोनिगरा, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधीक्षक अजय चौधरी, मिकी कोचर, ह्यूमन राइट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, विलास शिंदे, सुनंदाताई आवळे, राजाराम अस्वरे, दीपक चौगुले, विजय मोरे, देहूरोड आरपीआयचे अध्यक्ष अरविंद गायकवाड, गणेश कोळी, विजय पवार, संदीप बालघरे, भक्ती कुरकुट, वैशाली आवघडे, शशी सप्पागुरू, सुरेश बागाव यांच्यासह कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संजय (नाना) धुतडमल यांनी केले. सुनील गुरव यांनी सूत्रसंचालन केले, तर राजाराम अस्वरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोमल शिंदे, संजय साठे, कैलास वारके, प्रतीक धुतडमल, मनोज क्षिरसागर, संतोष खुडे, आर्यन खरात तसेच सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या संयुक्त कार्यक्रमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा आणि लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेचा वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
