पिंपरी, प्रतिनिधी : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या दीड दिवसांच्या शालेय शिक्षणाच्या बळावर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य, शाहिरी, पोवाडे आणि लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य उभे केले. आपल्या जिद्द, प्रतिभा आणि लेखणीच्या जोरावर त्यांनी मराठी साहित्यविश्वात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा समाजाने जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबर यांनी पुढे सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांनी वंचित, शोषित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या वेदना आपल्या साहित्याद्वारे मांडत त्यांना न्याय आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. *’फकीरा’*सारख्या अजरामर कादंबरीतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडला, तर आपल्या शाहिरीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव देश-विदेशात पोहोचविला. सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि मानवी मूल्यांचा त्यांनी दिलेला संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास नगरसेविका अनुराधा गोरखे, उपायुक्त आण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य भगवान शिंदे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, जेजुरी संस्थानचे विश्वस्त अनिल सौदंडे, सामाजिक व विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
