पिंपरी : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून साकारलेली वारकरी संप्रदायाची तैलचित्रे सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, त्यावर गुटखा व पानाच्या पिचकाऱ्यांमुळे विद्रूप स्वरूप आले आहे. त्यामुळे ही तैलचित्रे तातडीने दुरुस्त करून नव्याने रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे की, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी या मार्गाने प्रवास करतात. अशा वेळी वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी तैलचित्रे स्वच्छ, आकर्षक व सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र सध्या या तैलचित्रांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, त्यामुळे परिसरात बकालपणा दिसून येत आहे.
त्यामुळे पालखी सोहळ्यापूर्वी संबंधित तैलचित्रांची दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होईल तसेच शहराची सांस्कृतिक ओळख अधिक प्रभावीपणे अधोरेखित होईल.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागास आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा सचिन काळभोर यांनी व्यक्त केली आहे.
