पिंपरी-चिंचवड, दि. २९ जून : सांगवी येथील सरकार सेतू पुलावरील रोषणाई व सुशोभीकरणाच्या कामात आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त करत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. या कामासाठी दाखविण्यात आलेल्या खर्चाबाबत गंभीर शंका उपस्थित करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
स्थापत्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सरकार सेतू पुलावरील रोषणाई व सुशोभीकरणाच्या कामावर सुमारे २२ कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष पुलावरील एमएस साहित्याचे प्रमाण, वापरण्यात आलेले साहित्य आणि इतर कामांचा विचार करता संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे ५ कोटी रुपयांपर्यंतच अपेक्षित असल्याचा दावा भोईर यांनी केला आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे १७ कोटी रुपयांच्या खर्चाबाबत गंभीर संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर स्वतंत्र तांत्रिक समितीकडून प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून साहित्याची पडताळणी, आर्थिक लेखापरीक्षण तसेच अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (एमबी), बिले, देयके आणि मंजुरी आदेशांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सार्वजनिक निधीशी संबंधित या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी तातडीने चौकशीचे आदेश देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी. चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
