महाड, प्रतिनिधी : सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावपूर्ण समाजनिर्मितीसाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती स्मिता कवडे, श्री विजय जाधव आणि श्री महादेव गोठणकर यांना कोंकण विभागातून “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे.
विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे तसेच राज्यातील विविध सामाजिक सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ मध्ये हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सामाजिक परिवर्तन, संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि समाजातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी या तिन्ही कार्यकर्त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे आयोजित विशेष समारंभात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, डॉ. शरणकुमार लिंबाळे आणि पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराबद्दल श्रीमती स्मिता कवडे, श्री विजय जाधव आणि श्री महादेव गोठणकर यांच्यावर विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
