देहूरोड, दि. २१ जून – देहूरोड परिसरात गुन्हेगारीचा थरार अक्षरशः रस्त्यावर उतरल्याचे चित्र समोर आले आहे. एका बाजूला नातेवाईकांतील जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी रिक्षाचालकाला गाठत त्याच्यावर लाथाबुक्क्या, लाकडी दांडक्यांचा मारा केला आणि शेवटी कुऱ्हाडीने वार करत रक्तबंबाळ केले; तर दुसऱ्या प्रकरणात केवळ दुचाकीवरून ‘कट मारला’ या कारणावरून तीन विधी संघर्षित बालकांनी तरुणाला बेदम मारहाण करत कोयत्याच्या घावात त्याचा अंगठाच छाटला. अवघ्या काही तासांत घडलेल्या या दोन थरारक घटनांनी देहूरोड परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
जुना वाद पेटला… आणि नातेवाईकांनीच कुऱ्हाड उगारली!
देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, प्रदीप भिमराव गायकवाड (वय ४६, रिक्षाचालक, रा. चिंचोली, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेम ऊर्फ सनी अनिरुद्ध चोपडे, प्रणव मिलिंद चोपडे, अनुराधा सूर्यकांत चोपडे आणि अक्षय अनिल चोपडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जूनच्या रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचोली येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाजवळ ही रक्तरंजित घटना घडली. सुमारे महिनाभरापूर्वी जागेच्या साफसफाईवरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. मात्र नातेसंबंध असल्याने तेव्हा तक्रार देण्यात आली नव्हती. पण हा वाद आरोपींनी मनात धरला आणि संधी साधून फिर्यादीला गाठले. आधी शिवीगाळ, त्यानंतर लाथाबुक्क्या, मग लाकडी दांडक्यांनी मारहाण… आणि शेवटी कुऱ्हाडीने हल्ला करून फिर्यादीला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.
नातेवाईकांकडूनच असा जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खणसे करत आहेत.
‘कट’चा वाद थेट कोयत्यापर्यंत; तरुणाचा अंगठाच तोडला
देहूरोडमधील दुसरी घटना तर आणखी धक्कादायक ठरली. २१ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास संतोष स्वीटजवळील जितू पानटपरीसमोर ही थरारक मारहाण झाली. या प्रकरणी शशिकांत नागेश मासे (वय ४३, व्यवसाय – गॅरेज, रा. पोर्टर चाळ, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन विधी संघर्षित बालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा तुषार मासे आणि त्याचा मित्र अर्जुन भुंभक हे दुचाकीवर उभे असताना, दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून ‘कट’ मारल्याच्या किरकोळ कारणाचा राग मनात धरून तीनही बालकांनी संगनमताने त्यांच्यावर हल्ला चढवला. सुरुवातीला तुषारला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. त्यानंतर एका विधी संघर्षित बालकाने आपल्या ताब्यातील लाकडी मुठीच्या लोखंडी कोयत्याने तुषारवर सपासप वार केला. या हल्ल्यात तुषारच्या उजव्या हाताचा अंगठा पंजापासून वेगळा झाला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांसह शस्त्र कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
देहूरोडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धाबे दणाणले
अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांनी देहूरोडमधील वाढती हिंसा आणि बिनधास्त गुन्हेगारी पुन्हा उघड्यावर आणली आहे. किरकोळ कारणांवरून थेट कुऱ्हाड, कोयता यांसारखी धारदार शस्त्रे वापरली जात असतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो. नातेसंबंध, किरकोळ वाद, कट मारल्याची चिडचिड — आणि त्यातून थेट जीवघेणे हल्ले, हे चित्र अत्यंत भयावह असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू केला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
