पुणे, दि. १६ जून : मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत राष्ट्रीय पालखी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी ॲड. मयुर दत्तात्रयराव जाधव यांनी पुरंदर तालुक्यातील राष्ट्रीय पालखी महामार्गालगत असलेल्या गाव व वस्त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पथदिवे (लाईट्स) उभारण्याची मागणी केली. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडणारे नागरिक वाहनचालकांना स्पष्टपणे दिसावेत आणि संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी ही उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महामार्गावर वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर हायवे पोलिसांनी अधिक प्रभावीपणे गस्त घालावी, अपघातप्रवण ठिकाणांवर विशेष लक्ष द्यावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशीही मागणी त्यांनी बैठकीत केली.
राष्ट्रीय पालखी महामार्गावरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षाही ॲड. जाधव यांनी व्यक्त केली.
