देशाचे पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी काम करणार – कबीर कांबळे
पिंपरी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश संपादन करून पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उज्ज्वल करणारे कबीर राहुल कांबळे यांचा शहरातील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यूपीएससी परीक्षेत १२५ वा क्रमांक मिळवत त्यांची भारतीय वनसेवा (IFS) साठी निवड झाली आहे.
महानगरपालिका इमारतीतील पत्रकार कक्षात आयोजित कार्यक्रमात कबीर कांबळे यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या पुस्तकाने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या आई-वडिलांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, संतलाल यादव, बाबू कांबळे, अविनाश कांबीकर, दादाराव आढाव, दिलीप देहाडे, भीमराव बरकडे, युनूस खतिब आदी पत्रकार उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर आणि युवराज दखले यांनीही उपस्थित राहून कबीर कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकारांनी कबीर कांबळे यांच्या यशामागील अभ्यासपद्धती, कोचिंग आणि पुस्तकांविषयी माहिती जाणून घेतली. संतलाल यादव यांनी शहरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. तर मारुती भापकर, नाना कांबळे, युवराज दखले आणि बाळासाहेब ढसाळ यांनी गरीब, शोषित आणि वंचित घटकांसाठी काम करण्याचा सल्ला दिला.
आपले मनोगत व्यक्त करताना कबीर कांबळे म्हणाले की, दहावीत असताना तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यशैलीतून त्यांना यूपीएससीची प्रेरणा मिळाली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवत १२५ वा क्रमांक पटकावला. त्यांनी कोणतेही क्लास न लावता दररोज सुमारे ११ तास अभ्यास केला. ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील संपादकीय लेख नियमित वाचल्याचा त्यांना मोठा फायदा झाला.
मुलाखतीतील अनुभव सांगताना त्यांनी वनविभागाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्याचे नमूद केले. “देशात विकासकामांसाठी झाडांची तोड होत असली, तरी त्याऐवजी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करून काम करण्याची माझी इच्छा आहे,” असे कबीर कांबळे यांनी सांगितले.
कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा अभिमान वाढला असून, कबीर कांबळे हे शहरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
