आढले (मावळ) येथे मानवाधिकार संरक्षण संघटनेचा सन्मान सोहळा उत्साहात
पुणे/मावळ, आढले.प्रतिनिधी : समाजहित, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक कार्य, पर्यावरण संवर्धन तसेच गरजू व अडचणीत असलेल्या व्यक्तींना निःस्वार्थपणे मदत करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले श्री. सोनाराम नरिंगाराम बिश्नोई यांचा मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. आढले येथे सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, बिश्नोई समाजाचे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. सोनाराम बिश्नोई यांनी मागील दोन-तीन वर्षांत सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले. संकटाच्या काळात गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणे, सामाजिक प्रश्नांमध्ये संवेदनशीलतेने सहभाग घेणे तसेच पर्यावरण व जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे, या कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. प्रमोद केसरकर यांच्या हस्ते सोनाराम बिश्नोई यांना शाल, पुष्पगुच्छ, गौरव सन्मानपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण दवणे यांनी सोनाराम बिश्नोई यांच्या कार्याचे कौतुक केले. समाजसेवा ही केवळ औपचारिकता नसून संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी स्वतः पुढे येणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले. बिश्नोई यांचे कार्य समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनेचे पुणे जिल्हा पी.आर.ओ. श्री. आशिष गायकवाड यांनी गौरव सन्मानपत्राचे प्रभावी वाचन केले. या सन्मानपत्रातून बिश्नोई यांच्या सेवाभावी वृत्ती, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि समाजहितासाठी केलेल्या विविध उपक्रमांचा गौरव करण्यात आला.
मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या कार्याची माहिती
कार्यक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. प्रमोद केसरकर यांनी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या कार्याची व उद्दिष्टांची माहिती दिली. मानवाधिकारांचे संरक्षण, सामाजिक न्याय, गरजू व वंचितांना मदत, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृतीसाठी संघटना कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हा संघटनेच्या सामाजिक उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास आढले गावचे सरपंच विश्वास घुटकुले, श्री गुरु जंभेश्वर संस्थान, कात्रजचे अध्यक्ष मोहनलालजी डूडी, सचिव जगदीशजी सारण, मोहनजी बोला, अखिल भारतीय बिश्नोई महासभा पुणे जिल्हाध्यक्ष पूनमाराम जांगू, सरपंच हनुमानजी गोदारा, छोटू वीराराम खावा, अखिल भारतीय बिश्नोई महासभा जीव रक्षा, पालघरचे अध्यक्ष पपूलाल ढाका, हरदानजी डारा, सरपंच सुनिलजी गोदारा, महासभा सदस्य अर्जुनजी ढाका यांच्यासह पुणे व मुंबई येथील व्यापारी, समाजबांधव आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुळशी तालुका अध्यक्ष श्री. विशालशेठ भानुसे, तालुका सचिव श्री. आदिनाथ बुचडे, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष श्री. केतन रांजणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“समाजासाठी केलेली निःस्वार्थ सेवा हीच खरी मानवसेवा असून, पर्यावरणाचे रक्षण आणि गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे,” असा संदेश या सन्मान सोहळ्यातून देण्यात आला. श्री. सोनाराम बिश्नोई यांचा झालेला सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून सामाजिक सेवा, जीवदया, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेच्या कार्याचा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.