मानवाधिकार जनजागृतीसाठी साहसी मोटारसायकल मोहीम; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव
कणकवली प्रतिनिधी ,संतोष नाईक: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर यांनी मोटारसायकलवरून काश्मीर, लडाख आणि भारत-पाकिस्तान व भारत-चीन सीमावर्ती भागातील तब्बल ३५०० किलोमीटरचा खडतर प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या प्रवासादरम्यान त्यांनी मानवाधिकार संरक्षण संघटनेचा प्रचार व प्रसार केला. त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी संघटनेच्या कोकण विभागाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई व पालघर जिल्ह्यांच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते प्रणय बांदिवडेकर यांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
बांदिवडेकर यांनी आपल्या मोटारसायकल प्रवासातून साहस, सामाजिक बांधिलकी आणि संघटनेच्या कार्याचा प्रभावी संदेश दिला. संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी ते स्वखर्चाने पुढाकार घेत असून, मानवाधिकारांच्या जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ योगदानाबद्दल उपस्थितांनी कौतुक केले.
अमृतसरपासून चंदीगडपर्यंत रोमांचकारी प्रवास….
या साहसी मोहिमेला अमृतसर येथील सुवर्ण मंदिर व अटारी बॉर्डरपासून सुरुवात झाली. त्यानंतर श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, झोजिला पास, कार्गिल, झंस्कार खोरे असा प्रवास करत त्यांनी लडाखमध्ये प्रवेश केला.
कार्गिलहून नामिका ला, फोटू ला मार्गे लेह गाठल्यानंतर खारदुंग ला, नुब्रा व्हॅली, दिसकीत, हंडर सँड ड्यून्स, तुर्तुक आणि थांग या भारत-पाकिस्तान सीमावर्ती भागातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली.यानंतर पँगाँग लेक, हानले, उमलिंग ला पास, डेमचोक, फोती ला, न्योमा व पुगा व्हॅली असा अत्यंत आव्हानात्मक प्रवास त्यांनी पूर्ण केला. जगातील सर्वोच्च मोटरेबल रस्त्यांपैकी एक असलेल्या उमलिंग ला परिसरातील प्रवास हा त्यांच्या मोहिमेतील विशेष आकर्षण ठरला.परतीच्या प्रवासात त्यांनी मनाली-लेह महामार्गावरील लाचुंग ला, नकीला, बारालाचा ला, जिस्पा आणि मनाली मार्गे चंदीगड गाठत आपल्या ३५०० किलोमीटरच्या मोटारसायकल मोहिमेची यशस्वी सांगता केली.
गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव….
याच कार्यक्रमात संघटनेच्या वतीने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी २०२६ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. वैभववाडी तालुक्यातून प्रथम क्रमांक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण गटातून द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या कुमारी सानवी नारायण दळवी हिच्यासह विशेष प्राविण्य मिळवलेल्या कुमारी आर्या शांतिनाथ तेली व कुमार आराध्य अनिल मटकर यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी कणकवली तालुकाध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स, कणकवलीचे प्रोप्रायटर मंगेश चव्हाण, ट्रॉफी हाऊसचे प्रोप्रायटर श्री. व सौ. महेंद्र चव्हाण, कणकवली तालुका सदस्य अक्षय शेडेकर, कीर्ती आंबेरकर, गडमठ गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कोकण विभागातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.