आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते सोहळा; स्वच्छता व शाश्वत विकासासाठी लोकसहभागावर भर
पिंपरी-चिंचवड,दिं.०९ ऑगस्ट : शहरातील दत्तनगर येथे पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या ‘नवी दिशा – शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्पा’चा भव्य भूमिपूजन सोहळा आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी परिसरात कचरा व्यवस्थापनासाठी राबविण्यात येणारा हा अभिनव उपक्रम शहराच्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
शहरातील पहिलाच अभिनव उपक्रम
दत्तनगर येथे सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प शहरातील झोपडपट्टी परिसरासह इतर भागांमध्ये कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्यावर या प्रकल्पात विशेष भर देण्यात येणार आहे.
केवळ कचरा संकलन आणि विल्हेवाटीपुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे दत्तनगर परिसरासाठी हा प्रकल्प एक आदर्श मॉडेल ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन काळाची गरज
यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, “स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्याच्या आपल्या संकल्पाला हा प्रकल्प अधिक बळ देणार आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. दत्तनगरसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडसाठी हा उपक्रम विकासाची नवी दिशा ठरेल. भविष्यात अशा प्रकल्पांचा विस्तार संपूर्ण शहरात करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
मान्यवरांची उपस्थिती
भूमिपूजन सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक कुशाग्र कदम, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, आरोग्य अधिकारी राजू साबळे, आकार सोल्युशन्सच्या विजया कुचेकर तसेच सायडा संस्थेचे कार्यकारी संचालक प्रवीण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय श्रीराम सेवा ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक १० मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा प्रकल्प यशस्वी करून दत्तनगरला शून्य कचरा परिसराचा आदर्श बनविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
