नाशिक, प्रतिनिधी,दि.२७ जुलै : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नागरी सेवा प्रबोधिनी, नाशिक येथे प्रदेशाध्यक्ष अशोक दगडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत कर्मचारी हितासाठी सातत्याने केलेले कार्य, यशस्वी आंदोलने, बेमुदत संप आणि विविध विधायक उपक्रमांबद्दल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेचा राज्यस्तरावर विशेष गौरव करण्यात आला.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष अशोक दगडे, राज्य सरचिटणीस विश्वास काटकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांच्या हस्ते पुणे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे आणि कोषाध्यक्ष विजय लांघे यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एप्रिल २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यात २१ ते २४ एप्रिलदरम्यान झालेला कर्मचारी संप यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली.
सन्मान स्वीकारल्यानंतर मारुती शिंदे यांनी शासनातील रिक्त पदे तातडीने भरणे, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा सुरू करणे, अनुकंपा नियुक्त्या शंभर टक्के करणे, कंत्राटी पद्धत रद्द करून नियमित भरती करणे तसेच दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याची मागणी केली. सुधारित मंजूर पदरचना व सरळ सेवा प्रवेश नियमांमुळे भरती प्रक्रिया अडचणीत आल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोषाध्यक्ष विजय लांघे यांनी २०१७ पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या आरक्षणातील पदोन्नतीवरील स्थगितीमुळे हजारो कर्मचारी घटनात्मक लाभापासून वंचित असल्याचे सांगत, या प्रश्नावर संघटनेने प्रभावी भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
हा सन्मान कोणत्याही एका व्यक्तीचा नसून पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचारी बांधवांच्या सामूहिक कार्याची पावती असल्याचे सांगत, भविष्यातही कर्मचारी हक्कांसाठी अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत ११ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यव्यापी “मागणी दिन” साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये द्वारसभा घेऊन प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी व शासनाचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच ऑगस्टअखेर शेगाव येथे राज्यव्यापी आमसभा आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
याशिवाय राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ऑक्टोबर २०२६ मध्ये मुंबई अथवा छत्रपती संभाजीनगर येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच ऑक्टोबर २०२७ मधील राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर येथे आयोजित करण्याच्या प्रस्तावावर पुढील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
बैठकीत विश्वास काटकर आणि अशोक दगडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऐतिहासिक बेमुदत संपाच्या यशाबद्दल अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (RNPS) तसेच कर्मचारी वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले.
कर्मचारी हक्क, सामाजिक न्याय आणि संघटनात्मक एकजूट यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना भविष्यातही संघर्षशील राहील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
