हजारो वारकरी श्रमिकांचा सहभाग
पिंपरी | प्रतिनिधी ……आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी सांगता समारंभ व वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. सलग दुसऱ्या वर्षी काढण्यात आलेल्या या दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अबोलीताई पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात यशवंतभाऊ भोसले यांनी आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व सांगताना भक्त पुंडलिकाच्या आदर्शाचे स्मरण करून, “आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून भक्ती, सेवा, समता आणि संस्कारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे,” असे प्रतिपादन केले.
संत तुकाराम नगर येथील पुतळ्यापासून सुरू झालेली सुमारे तीन किलोमीटरची दिंडी महेशनगर, वल्लभनगर, गंगानगर परिसरातून विविध मंदिरांना प्रदक्षिणा घालत आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “जय जय राम कृष्ण हरी” या नामघोषांनी परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंग, वीणा, अभंग आणि पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांच्या नृत्यामुळे वातावरण भक्तिमय झाले.
दिंडीतील विशेष आकर्षण म्हणजे संतांच्या वेशभूषेत सजलेल्या लहान मुलांचा सुशोभित रथ. विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची रूपे साकारलेल्या बालवारकऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. नागरिकांनी मार्गभर फुलांचा वर्षाव व रांगोळ्यांनी दिंडीचे स्वागत केले.
दिंडीचे संपूर्ण नियोजन यशवंतभाऊ भोसले यांनी स्वतः लक्ष घालून केले. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, वाहतूक, शिस्त व सुरक्षिततेची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टप्प्यावर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात वारकरी परंपरेतील संस्कार, श्रमिकांचे समाजातील योगदान आणि यशवंतभाऊ भोसले यांच्या सामाजिक, धार्मिक व श्रमिक चळवळीतील कार्याचे कौतुक केले.
दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश पाटील, दिपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे, ओमकार देशपांडे, ओंकार जोखारे, अप्पू नायर, अंकुश वाघमारे, मानसी देशपांडे, आरती पराळे, इस्मात सय्यद, शालन महापुरे, संतोषी चौधरी, गणेश बुलदगड, विनायक निकम, श्रेयस करे, मल्लेश पोरवी, फौजदार गायकवाड, आप्पासाहेब माने, महेश भुते, सुधाकर शिंदे, सतीश सासवडे तसेच संत तुकाराम नगर सहकारी रचना मर्यादितचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद यांनी परिश्रम घेतले.
वारकरी श्रमिक मेळाव्याचे प्रास्ताविक यशवंतभाऊ भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले.
