पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी एका नागरिकाचा मृतदेह रविवारी मध्यरात्री आढळून आल्याने मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. दुर्घटनेतील सर्व बेपत्ता नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानंतर तब्बल ८४ तास सुरू असलेली बचावमोहीम मध्यरात्री २ वाजता अधिकृतपणे थांबविण्यात आली.
८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. घटनेनंतर एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर यंत्रणांनी संयुक्तपणे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
दुर्घटनेनंतर पाच जण स्वतः बाहेर पडण्यात यशस्वी झाले. उर्वरित १८ जणांपैकी ९ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. मात्र, सलग चार दिवस चाललेल्या शोधमोहीमेत इमारतीत अडकलेल्या सात जणांचे आणि इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका नागरिकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापूर्वी ९ जुलै रोजी भावेश वाणी यांचा मृत्यू झाला होता.
चौथ्या दिवशी अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२) आणि राहुल गायकवाड (३४) यांचे मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वामन कसबे (५०, मोशी) यांचा शोध मध्यरात्री १ वाजता लागला. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दुर्घटनाग्रस्त इमारतीत प्रवेश करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. इमारत अस्थिर असल्याने आणखी दुर्घटना टाळण्यासाठी अत्यंत सावधगिरीने काम करण्यात आले. दोन अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटरच्या सहाय्याने वरचा मजला हटवून काँक्रीट फोडत बचाव पथकाने आत प्रवेश केला. एनडीआरएफच्या श्वान पथकाचीही शोधकार्यात मदत घेण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण बचावकार्यात प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवले. अखेर सर्व बेपत्ता नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्री २ वाजता बचावमोहीम अधिकृतरीत्या संपुष्टात आली.
महापौर रवि लांडगे यांनी या दुर्घटनेला शहरासाठी अत्यंत वेदनादायी घटना संबोधत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “महापौर म्हणून नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने मन अत्यंत व्यथित झाले आहे. कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे त्यांनी म्हटले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत, “९ नागरिकांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. सलग ८४ तास यंत्रणांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य केले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” अशी भावना व्यक्त केली.
