पिंपरी-चिंचवड, दि. १२ जुलै २०२६ : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटना ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचा गंभीर आरोप करत महापालिका आयुक्त आणि संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. चिंचवड येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख चेतन पवार उपस्थित होते.
अंधारे म्हणाल्या की, अवघ्या अकरा महिन्यांत इमारत कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांचा ठावठिकाणा काय, प्रकल्पाला नेमका कुणाचा राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त आहे आणि संबंधित यंत्रणा एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दुर्घटनेतील सर्व माहिती आणि संबंधितांची अधिकृत यादी प्रशासनाने तातडीने जाहीर करावी, असेही त्या म्हणाल्या.
घनकचरा प्रकल्पातील चिमणी पर्यावरण दिनी कोसळल्यानंतरही महापालिका प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आरोप अंधारे यांनी केला. प्रकल्पालगत असलेल्या खदानीतील ब्लास्टिंग, संरक्षक भिंतीचा अभाव आणि कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या मिथेनसारख्या वायूंमुळे नागरिक व कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून वेळेवर आणि अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा संवेदनशील प्रसंगी प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
दुर्घटनेनंतर अँटनी लॉरा कंपनीने जाहीर केलेली पाच ते दहा लाख रुपयांची मदत अपुरी असल्याचे सांगत मृत कामगारांना भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि इतर कायदेशीर लाभ मिळत होते का, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. केवळ आर्थिक मदत जाहीर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, असा इशारा देत दोन दिवसांनंतर पुन्हा या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास न्यायालयीन लढाई लढली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका करत अंधारे म्हणाल्या की, या दुर्घटनेकडे सरकारने अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नाही. पर्यावरण मंत्री, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित मंत्री घटनास्थळी न आल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच सफाई कर्मचारी आयोगाने या दुर्घटनेची स्वतःहून दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
“दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शांत बसणार नाही. या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा निर्धार सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
