निगडी, दि.२९ जून २०२६ : समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने “साहित्यिक संवाद” हा साहित्यिक उपक्रम रविवारी स्व. दत्तोपंत म्हसकर सभागृह, निगडी-प्राधिकरण येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण होते. समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षा मानसी चिटणीस यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, समरसता गीत आणि सुभाष चव्हाण यांच्या शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आर्चिस केळकर, सुनिता कुलकर्णी आणि उज्वला केळकर यांनी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद आणि डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रातील प्रेरणादायी उताऱ्यांचे अभिवाचन केले.
यावेळी डॉ. गिरीश आफळे, रविकांत कळमकर, प्रा. तुकाराम पाटील, शोभा जोशी, राजन लाखे, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, सुरेश कंक, संदीप तापकीर, रमेश वाकनीस, विजय शेंडगे, पंजाबराव मोंढे, ह.भ.प. अशोक महाराज गोरे, नंदकुमार मुरडे, सविता इंगळे, प्रदीप तळेकर, राजेंद्र देशपांडे, नीलिमा फाटक, राधाबाई वाघमारे, माधुरी विधाटे, कैलास भैरट, आनंदराव मुळुक, सुलभा सत्तुरवार, अश्विनी रानडे, वैशाली मोहिते, शरद काणेकर, रजनी अहेरराव, राजेश चौधरी, मीनाताई पोकरणा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि परिसरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यिक संवाद साधताना योगेश सोमण म्हणाले, “समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच साहित्य असते. खऱ्या अर्थाने समाजच माणसाला साहित्य शिकवतो. साहित्यिक समाज घडवत नाही, तर समाजच साहित्य घडवतो. लेखक हा स्वतःचा पहिला वाचक असतो. साहित्य हे जीवनानुभवातून यावे; त्यात कृत्रिम कल्पनाविलास नसावा. उपदेशापेक्षा कृतीतून परिणाम साधणारे लेखन अधिक प्रभावी ठरते.”
ते पुढे म्हणाले, “साहित्यिकांनी एका चौकटीत अडकून न राहता सातत्याने नवे शिकले पाहिजे. सकारात्मकता हीच शाश्वत आहे. तरुण पिढी वाचन करत नाही हा गैरसमज असून, ते काय वाचतात याचा अभ्यास साहित्यिकांनी केला पाहिजे. साहित्य समृद्ध होण्यासाठी समाजातील माणसे एकत्र येणे आवश्यक आहे.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड शहर कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध आणि नागरी कर्तव्य या ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेवर विचार मांडत, “नव्या पिढीला अभिमान वाटेल असा देश आपण घडवूया,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रश्नोत्तर सत्रात नारायण देशपांडे, नितीन हिरवे आणि नीलिमा फाटक यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य वाढविणे, दूरदर्शनवरील नकारात्मक आशय, विद्रोही साहित्याची दिशा, लोहगड घटनेवरील साहित्यिकांची भूमिका आणि साहित्य परिषदेच्या शाखा विस्तारासंदर्भातील प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रश्नांना योगेश सोमण यांनी समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसी चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा पाठक यांनी तर आभार प्रदर्शन सुहास घुमरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन राऊत, नारायण देशपांडे, हेमंत जोशी, जयश्री श्रीखंडे, निलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, सुरेश जोशी, श्रद्धा चटप आणि निलेश देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रज्ञा फुलपगार यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
