अहिल्यानगर (श्रीगोंदा) प्रतिनिधी….. सामाजिक बांधिलकी जपत सर्व जाती-धर्मांतील विवाह इच्छुकांचे संसार थाटण्याचे कार्य करणारे श्रीगोंद्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा ढवळे सर्व जाती-धर्मीय वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष सुभाष ढवळे यांनी आतापर्यंत १६०० हून अधिक विवाह जुळवून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, नुकताच त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथील रहिवासी असलेले सुभाष ढवळे हे सामाजिक कार्याची आवड जोपासत श्रीगोंदा येथे स्थायिक झाले. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून विवाह इच्छुक युवक-युवतींचे विवाह जुळविण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. वाढत्या सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर विवाह जुळविणे कठीण होत असताना त्यांनी हजारो कुटुंबांना आनंदाचे क्षण दिले आहेत.
सुभाष ढवळे यांनी सर्वधर्मीय आणि सर्व समाजातील युवक-युवतींच्या विवाहासाठी निःस्वार्थपणे कार्य करत १६०० हून अधिक शुभविवाह घडवून आणले आहेत. दोन कुटुंबांना एकत्र आणून सामाजिक सलोखा आणि माणुसकीची भावना जपण्याचे कार्य त्यांच्या वधू-वर सूचक मंडळामार्फत सातत्याने सुरू आहे.
त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत प्रहार दिव्यांग संघटना, अहिल्यानगर आणि जय मल्हार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष माधव गडदे, जिल्हाध्यक्ष विजय तमनर, सचिन जगताप, राजेंद्र पोकळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, अनिताताई कदम, संजय लाड, आबासाहेब ढवळे यांच्यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुभाष ढवळे यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, एका विवाह सोहळ्यानिमित्त विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सुभाष ढवळे यांची भेट घेऊन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी ढवळे वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने सुभाष ढवळे यांच्या हस्ते राम शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
