५० हजारांची खंडणी घेताना चौघे रंगेहात जेरबंद; भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई
पुणे, प्रतिनिधी : जिवे मारण्याची तसेच बांधकाम पाडून टाकण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली. कात्रज येथील किनारा हॉटेलमध्ये ५० हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी ही धडक कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विनोद गायकवाड, संग्राम सोनवणे, सुधीर शेडगे आणि निलेश कुंभार अशी आहेत. आरोपींविरुद्ध खंडणी, धमकी आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान आरोपींकडून सुमारे ७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
दरम्यान, या आरोपींनी यापूर्वीही कोणाला धमकी देऊन खंडणी उकळली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा त्रास झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांच्या तत्परतेमुळे यशस्वी ठरली असून, खंडणीखोरांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
