पिंपरी-चिंचवड, दि. २२ जून २०२६ : धाराशिव जिल्ह्यातील मातंग समाजातील तरुण स्व. अविनाश खंडागळे यांनी आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी प्राणत्याग केल्याची घटना अत्यंत वेदनादायी असून, हे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असा ठाम इशारा हिंदू मातंग सेना व शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे मातंग समाजबांधवांना भावनिक आवाहन केले आहे.
युवराज दाखले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “बंधूंनो, अविनाश दादा शहीद झाला, त्याचे रक्त सांडले; मात्र मी हात जोडून विनंती करतो की, असे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये. आपण आरक्षणाची लढाई त्याच्यासाठी आणि समाजाच्या भविष्यासाठी लढत आहोत. तो गेल्यानंतर आरक्षणाचा उपयोग काय? त्यामुळे समाजातील कुणीही आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारू नये.”
दाखले यांनी पुढे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी आरक्षण वर्गीकरणाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता ही लढाई न्यायालयीन, घटनात्मक आणि लोकशाही मार्गानेच पुढे नेली जाईल. “मातंग समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही; मात्र हा संघर्ष जिवंत राहून करायचा आहे, मरून नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दाखले यांनी शासनालाही कडक इशारा देत मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. “जर शासनाने दुर्लक्ष केले आणि भविष्यात अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडल्या, तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी स्व. अविनाश खंडागळे यांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची भूमिका जाहीर केली. “अविनाश दादाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, ही आता आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मातंग समाजबांधवांना युवराज दाखले यांचे आवाहन
💮जीव महत्त्वाचा आहे : अविनाश दादा गेला, आता दुसरा कोणीही जाऊ द्यायचा नाही. समाजात जनजागृती करा.
💮कायदेशीर लढा उभारा : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने आहे. आयोग, आंदोलन आणि न्यायालयीन मार्गाने संघर्ष सुरू ठेवू.
💮 एफआयआर दाखल करा : उपवर्गीकरणाला विरोध करणारे कपिल के. सरोदे, राजू चाटे व इतर विरोधक तसेच शासन यांनाही जबाबदार धरावे
दाखले यांनी शेवटी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या विचारांची आठवण करून दिली. “शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश देत त्यांनी मातंग समाजाला आत्महत्येऐवजी संघटित आणि घटनात्मक संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. “अविनाश दादाच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण जिवंत राहू, लढू आणि न्याय मिळवू,” असे आवाहन त्यांनी केले.
