सोलापूर | प्रतिनिधी…संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अत्यंत भीषण दुर्घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांनी भरलेले पिकअप वाहन रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दोन जणांना जीव वाचवण्यात यश आले असून मृतांमध्ये चार लहान मुले आणि चार महिलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी गावाच्या शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला असलेल्या आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीला कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने पिकअप थेट विहिरीत कोसळले.
विहीर पूर्णपणे भरलेली असल्यामुळे वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. परिणामी १४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत केवळ दोन जण बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या बचावकार्यात विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
घटनेची माहिती मिळताच उत्तम जाणकर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली. तसेच जयकुमार गोरे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. रस्त्यालगतच्या विहिरीला संरक्षक कठडे का नव्हते, यासह सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येईल. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”
सध्या पोलीस व प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून वाहन आणि उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
