‘श्री साई जीवन गौरव पुरस्कार’ देऊन लोककलावंतांचा सन्मान
शिर्डी, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, लोकसंस्कृती आणि ग्रामीण परंपरांचे वैभव उजागर करणारा भव्य लोककलावंत महामेळावा व लोककलावंत सन्मान सोहळा नुकताच शिर्डी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री साईबाबा संस्थान, शिर्डी यांच्या सहकार्याने आणि लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातील तब्बल आठ हजारांहून अधिक लोककलावंतांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या चरणी काढण्यात आलेल्या भव्य प्रभात फेरीने झाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या हजारो महिला व पुरुष कलावंतांनी या फेरीत सहभागी होत लोककलेचा जागर केला. त्यानंतर शिर्डी संस्थानच्या शताब्दी मंडप सभागृहात लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवात आदिवासी नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, सनई-संबळ वादन, बँड पथक, भारूड, पोवाडे, तमाशा आदी विविध लोककला प्रकारांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. कलाकारांच्या दमदार सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सभागृहात एवढी गर्दी झाली होती की बसण्यासाठीही जागा उपलब्ध नव्हती.
लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे आणि त्यांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून योगदान देणाऱ्या निर्मला सरोदे यांच्या ग्रामीण व दुर्गम भागातील उपेक्षित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली आज संघटनेत सुमारे ५० हजार लोककलावंत कार्यरत असून महाराष्ट्रातील लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे.
ग्रामीण भागातील अनेक गुणी कलाकारांना योग्य संधी मिळत नसल्याने त्यांची कला लोप पावण्याच्या मार्गावर असल्याची बाब लक्षात घेऊन गवनेरजी सरोदे यांनी गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर लोककलावंतांचे भक्कम जाळे उभे केले आहे. त्यामुळे हजारो कलाकारांना नवे व्यासपीठ मिळाले असून लोककलेच्या संवर्धनाला मोठी चालना मिळाली आहे.
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच निवडक कलावंतांना “श्री साई जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
शिर्डी संस्थानच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांचा सत्कार केला. शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी दूरध्वनीद्वारे आयोजक आणि कलावंतांना शुभेच्छा दिल्या. लोककलावंतांच्या प्रश्नांसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भांगरे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन मंगेश फाटकर यांनी केले. आभार प्रदर्शन संपादक पोपट सोनवणे यांनी मानले.हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी गवनेरजी सरोदे, सर्जेराव कदम, नवनाथ राक्षे, रवींद्र वाकोडे, धोंडीराम दिवे, राजू मंतोडे, ज्ञानेश्वर गांगड, दिलीप पवार, मच्छिंद्र आसवले, ललित धनगर, नारायण पथवे, विमल डोंगरे, सोमा आसवले, अनिल सोनवणे, मारुती आसवले तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटना आणि हजारो महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
लोककलेचा वारसा जपत ग्रामीण कलाकारांना नवे बळ देणारा हा महामेळावा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक संस्मरणीय पर्व ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
