‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत १११ मुली पालकांच्या स्वाधीन
अहिल्यानगर,राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा अवघ्या चार दिवसांत छडा लावत राहुरी पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यात यश मिळवले. मुलीला सुरक्षितरित्या शोधून तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत आतापर्यंत १११ मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका फिर्यादीने आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत २७ मे २०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच राहुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अपहृत मुलगी सुरक्षितरित्या मिळून आली. पोलिसांनी तिची विचारपूस करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे, पोलीस नाईक कुदळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल पठाण, महोम आणि पवार यांनी सहभाग घेतला. तसेच तपासासाठी तांत्रिक मदत श्रीरामपूर येथील मोबाइल सेलचे पोलीस हवालदार दरेकर आणि धनाड यांनी केली.
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत हरवलेल्या आणि अपहृत मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविली जात असून, या मोहिमेला उल्लेखनीय यश मिळत आहे.
