अंबड प्रतिनिधी……अंबड तालुक्यातील शासकीय यंत्रणा ही केवळ कागदी कारभारापुरती मर्यादित नसून संकटात सापडलेल्या नागरिकांचा आधारवडही ठरू शकते, याचा प्रत्यय अंबड येथे आला आहे. एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या हृदयद्रावक बातमीची तातडीने दखल घेत जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या शर्मा कुटुंबाला तातडीचा दिलासा दिला आहे.
हृदयद्रावक परिस्थिती; प्रशासनाची तात्काळ धाव
अंबड शहरातील मोहन टॉकीज परिसरातील जुन्या वेशीजवळ शर्मा कुटुंब भंगारासारख्या तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहे. कुटुंबात दोन बहिणी आणि एक भाचा असून त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एका महिलेला कुष्ठरोगाची बाधा झाल्याने तिच्या हातापायांची बोटे झिजली आहेत, तर तिचा मुलगा मुका-बहिरेपणामुळे अनेक अडचणींना सामोरे जात आहे. पावसाळ्यात झोपडीत गुडघाभर पाणी साचत असल्याने त्यांचे जगणे अक्षरशः नरकयातना बनले होते.ही बाब समोर येताच तहसीलदार विजय चव्हाण यांनी सायंकाळी महसूल पथकासह घटनास्थळी भेट देत कुटुंबाची प्रत्यक्ष पाहणी केली.
जागीच मदतीचा वर्षाव
प्रशासनाने केवळ सांत्वन न करता तातडीने मदतीची ठोस पावले उचलली.
💮कुष्ठरोगग्रस्त महिलेकडे आधार कार्ड नसल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. तहसीलदारांनी तत्काळ आधार केंद्र चालकाला बोलावून व्होटर आयडीच्या आधारे जागीच आधार नोंदणी प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आता त्यांना दरमहा २५०० रुपयांच्या मानधनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
💮पुरवठा विभागामार्फत कुटुंबाला तातडीने ‘अंत्योदय रेशन कार्ड’ मंजूर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या अन्नाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
💮व्यवसायासाठी कुटुंबाने केवळ दोन हजार रुपयांची मदत मागितली होती. मात्र तहसीलदारांनी स्वतःच्या खिशातून पाच हजार रुपयांची रोकड देत संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले.
स्वावलंबनासाठी नवा हातगाडा
भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाचा भाड्याचा हातगाडा मोडला होता. पुन्हा कोणासमोर हात पसरावे लागू नये म्हणून महसूल प्रशासनाने त्यांच्यासाठी स्वतःच्या मालकीचा नवा हातगाडा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.
पक्क्या घरासाठी प्रशासन सरसावले
या कुटुंबाला कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पक्के शेड किंवा घर उभारून देण्याचा निर्धार केला आहे. तसेच शासकीय घरकुल योजनेंतर्गत त्यांना कायमस्वरूपी निवारा मिळवून देण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
“प्रशासन नव्हे, हे आमचे देवदूत…”
महसूल विभागाचे पथक प्रत्यक्ष दारात पोहोचल्याचे पाहून शर्मा कुटुंबाला अश्रू अनावर झाले. “साक्षात देवच आमच्या मदतीला धावून आला,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचे आभार मानले.
प्रशासनाच्या या संवेदनशील आणि मानवतावादी भूमिकेचे अंबड शहरासह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
