आकुर्डीत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
आकुर्डी, दि.१७ ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असतानाच वर्ल्ड ऑफ मदर, जय गणेश व्हिजन, आकुर्डी येथील प्रांगणात ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन (मानवाधिकार संरक्षण संघटना) यांच्या वतीने ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उपअभियंता शांताराम कोलब, ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी आणि उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा फडकताच उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला अभिवादन केले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सुरू होताच उपस्थित पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सन्मानपूर्वक उभे राहून राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद केसरकर यांनी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या सामाजिक कार्याची माहिती देताना संघटनेच्या माध्यमातून नागरिकांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. उपअभियंता शांताराम कोलब यांनी, “समाजसेवा हीच राष्ट्रसेवा आहे. त्यासाठी प्रत्येकाने कायम सेवाव्रती राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन केले.
स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान, त्यांचा संघर्ष तसेच देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाची असलेली जबाबदारी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. देशाची अखंडता, एकता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी आपापल्या परीने योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक सचिव रामदास खोत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ रोकडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, ‘प्रभाकर न्युज’चे मुख्य संपादक, संघटनेचे सल्लागार श्रीधर जगताप,पुणे जिल्हाध्यक्ष सचिन गाडे, पुणे जिल्हा जनसंपर्क अधिकारी आशिष गायकवाड, सोलापूर शहर उपाध्यक्ष गणेश जाधव, सोलापूर शहर सल्लागार पिराजी नाईकवाडे, पिंपरी-चिंचवड जनसंपर्क अधिकारी तानाजी मेंगुलकर, देहूरोड शहर उपाध्यक्ष रफिक सय्यद, देहूरोड शहर सचिव जाकीर सय्यद, कमल राज नायर आणि अंबरीश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्याचा गौरव, तिरंग्याबद्दलचा आदर आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतीलाल सोरटे यांनी केले.