हडपसरमध्ये एएसआय जनार्धन भागवत यांचा माणुसकीचा आदर्श; मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे व रोख रकमेसह बॅग केली सुखरूप परत
पुणे, प्रतिनिधी,दिं.१७ ऑगस्ट : कर्तव्य बजावत असताना नागरिकांच्या अडचणीच्या प्रसंगी धावून जात त्यांना मदत करणे, हीच खरी पोलीस सेवाभावाची ओळख आहे. याचा प्रत्यय हडपसर येथे दि. १६ ऑगस्ट रोजी आला. घरफोडीच्या कॉलवर जात असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्धन गणपत भागवत यांनी हरवलेली बॅग शोधून ती संबंधित कुटुंबाला सुखरूप परत केली.
दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता एएसआय जनार्धन भागवत हे चंदननगर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या कॉलवर कर्तव्य बजावण्यासाठी जात असताना हडपसर वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ थांबले होते. यावेळी श्री. श्रीकांत मेटकरी, त्यांच्या पत्नी सौ. माधुरी मेटकरी आणि त्यांच्या दोन लहान मुली घाबरलेल्या अवस्थेत बॅग शोधण्यासाठी धावपळ करताना त्यांना दिसले.
मेटकरी कुटुंबीयांनी सांगितले की, ते सुरक्षा नगर, हडपसर येथून आंबेजोगाई (बीड) येथे जाण्यासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, घाईगडबडीत त्यांची एक बॅग रिक्षामध्येच राहून गेली होती. या बॅगेमध्ये मोबाईल फोन, महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम असल्याने कुटुंबीय चिंतेत होते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एएसआय भागवत यांनी तातडीने बॅग शोधण्याची कार्यवाही सुरू केली. बॅगेतील मोबाईल क्रमांकावर वारंवार संपर्क साधल्यानंतर अखेर रिक्षाचालकाने फोन उचलला. त्याच्याशी संपर्क साधून बॅग परत आणण्याची विनंती करण्यात आली.
पोलीस अधिकाऱ्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत रिक्षाचालक अवघ्या १५ मिनिटांत बॅग घेऊन हडपसर येथे आला. बॅगेतील सर्व साहित्य तपासून ते जसेच्या तसे मेटकरी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन म्हणून १०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
या प्रसंगातून पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि माणुसकीचा प्रत्यय आला आहे. ‘पोलीस हा केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारा अधिकारी नसून, संकटाच्या काळात नागरिकांचा आधार असतो,’ हे एएसआय जनार्धन भागवत यांच्या कृतीतून अधोरेखित झाले.
मेटकरी कुटुंबीयांनी बॅग सुरक्षितपणे परत मिळाल्याबद्दल एएसआय भागवत तसेच प्रामाणिकपणे बॅग परत करणाऱ्या रिक्षाचालकाचे मनःपूर्वक आभार मानले.
पोलीस अधिकारी आणि जनतेचा सेवक म्हणून कर्तव्य बजावताना दाखविलेल्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
‘पोलीस सेवेत कर्तव्याबरोबर माणुसकीही महत्त्वाची!’ — एएसआय जनार्धन भागवत यांच्या कृतीतून संदेश