भाजपा मुख्य प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे यांचा आमदार रोहित पवारांना इशारा; ‘पिंपरी-चिंचवड हे राजकीय प्रयोगांचे मैदान नव्हे!’
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी..मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या घटनेचे राजकीय भांडवल करण्याऐवजी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची निष्पक्ष व वस्तुनिष्ठ चौकशी करणे तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा मुख्य प्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी मांडली.
दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोशी दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून मृतांच्या कुटुंबीयांचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. महापालिकेने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासोबतच दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
‘पुराव्यांशिवाय आरोप सहन करणार नाही’
दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी करणे हा लोकशाहीतील प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, कोणतेही ठोस पुरावे किंवा अधिकृत कागदपत्रे नसताना भाजपचे स्थानिक नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर वारंवार आरोप करणे योग्य नाही. अशा प्रकारचे आरोप आम्ही सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा दुर्गे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना दुर्गे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये वारंवार येऊन स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप करण्याऐवजी ठोस पुरावे आणि अधिकृत कागदपत्रांसह भूमिका मांडावी. केवळ राजकीय वक्तव्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तथ्यांच्या आधारे योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.
‘पिंपरी-चिंचवड हे कोणाच्याही राजकीय प्रयोगाचे मैदान नाही’
पिंपरी-चिंचवड हे कोणत्याही एका व्यक्तीच्या राजकीय प्रयोगाचे मैदान नाही. शहरातील प्रश्नांवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जनतेचा आहे. नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली असून, जनतेने दिलेल्या जनादेशाचा सर्वांनी आदर करावा, असेही दुर्गे यांनी नमूद केले.
आज पिंपरी-चिंचवडसमोर कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या विषयावर राजकीय श्रेयवाद करण्यापेक्षा विधायक चर्चा आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे. प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण यंत्रणा अधिक सुरक्षित, आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मृतांना खरी श्रद्धांजली म्हणजे कायमस्वरूपी उपाययोजना’
मोशी दुर्घटनेतील मृतांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे होय.
“राजकारण करायचे असेल तर विकासाच्या मुद्यांवर करा; मात्र मृतांच्या दुःखावर राजकारण करू नका. शहराच्या स्थापनेपासून कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचे सर्वांनी आत्मचिंतन करावे,”
……राजाभाऊ दुर्गे, प्रवक्ते.पिं.चिं.शहर भाजपा.