डॉ. अमोल कोल्हेंची पंतप्रधानांशी भेट; बिबट्यांचा प्रश्न, इंद्रायणी मेडिसिटी, शिवसंस्कार सृष्टीसह औषधी वनस्पती संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा
पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावित जुन्या मार्गानेच व्हावा, यासाठी जगातील १९ देशांमध्ये रेडिओ क्वाएट झोनच्या परिसरात सुरू असलेल्या प्रवासी व मालवाहतूक रेल्वेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. या मागणीबाबत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
बिबट्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न ऐरणीवर
जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढला असून, आतापर्यंत अनेक ग्रामस्थांचा, विशेषतः लहान मुलांचा बळी गेला आहे. त्यामुळे बिबट्याचा समावेश असलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यातील शेड्युल १ मधून त्याला वगळून शेड्युल २ मध्ये समावेश करावा, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी निवेदनाद्वारे केली. या गंभीर विषयाची दखल घेत आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
इंद्रायणी मेडिसिटीला गती देण्याची मागणी
तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांनी राज्याच्या विधानसभेत इंद्रायणी मेडिसिटी या महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, घोषणा होऊन चार वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकल्प अद्याप प्रलंबित असल्याचे डॉ. कोल्हे यांनी निदर्शनास आणून दिले. इंद्रायणी मेडिसिटीला गती देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
जुन्नरमध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राची मागणी
शिरूर लोकसभा मतदारसंघातील आदिवासीबहुल भागात, विशेषतः जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात. या वनस्पतींचे संवर्धन तसेच त्यावर संशोधन करण्यासाठी जुन्नर येथे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी करण्यात आली.
तत्कालीन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. या विषयातही लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
शिवनेरीच्या पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ची मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ उभारण्यासाठी गेल्या सहा-सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांना दिली.
‘शिवसंस्कार सृष्टी’ उभारल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यातून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील. तसेच देशातील नव्या पिढीबरोबरच परदेशी पर्यटकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची ओळख होईल, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
एमआयडीसीसाठी थेट न्हावाशेवा जोडणीची मागणी
तळेगाव, चाकण, रांजणगाव यांसह विविध एमआयडीसींमधील उद्योगांना सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. उद्योगांना मालवाहतुकीसाठी स्वस्त, वेगवान आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत उरण-तळेगाव-चाकण-संभाजीनगर असा नवीन समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्ग (Dedicated Freight Corridor) उभारण्यात यावा. या मार्गाद्वारे उद्योगक्षेत्राला थेट न्हावाशेवा बंदराशी जोडण्यात यावे, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.
फुले दाम्पत्यांसह अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराजांना भारतरत्नची मागणी
महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणीही डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच विषय पंतप्रधान मोदी यांनी आस्थेने समजून घेतले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासह बिबट्यांचा प्रश्न, इंद्रायणी मेडिसिटी, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र, ‘शिवसंस्कार सृष्टी’, मालवाहतूक रेल्वे मार्ग तसेच भारतरत्नाच्या मागणीबाबत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.मतदारसंघातील सर्व विषय आस्थेने समजून घेतल्याबद्दल डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
