धरणाच्या पाण्याने गावाला चारही बाजूंनी वेढा; पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अमरावती | प्रतिनिधी – नितेश कानबाले..…अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यात ३० जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि साखळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने निर्माण झालेल्या बॅकवॉटरच्या तडाख्यात मौजा मलकापूर (ढेंगाळा) परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो एकरांवरील पिके पाण्याखाली गेली असून शेतीचे बांध फुटल्याने नुकसानाची तीव्रता अधिक वाढली आहे.
गावालगत असलेल्या साखळी नदी व नाल्यांमध्ये धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने नदीकाठावरील शेतीमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिके वाहून गेली असून अनेक शेतजमिनी चिखलमय झाल्या आहेत. दरवर्षी बॅकवॉटरमुळे अशाच प्रकारचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गावाला पाण्याचा विळखा; रात्रभर जागून काढली रात्र
साखळी धरणाच्या बॅकवॉटरमुळे मलकापूर गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढा घातला होता. गावाकडे जाणारा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने मलकापूर, खानापूर आणि गोडेगाव या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला. भीतीच्या वातावरणात गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
दरम्यान, एक व्यक्ती कमी पाण्याचा अंदाज घेऊन गावाकडे येत असताना गावाभोवती पाण्याचा वेढा निर्माण झाल्याने मध्येच अडकली. रात्री उशिरापर्यंत तिचा संपर्क होत नसल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले होते. अखेर मध्यरात्रीनंतर ती व्यक्ती जंगलाच्या मार्गाने सुरक्षित घरी परतल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
“सरकार, आमचे पुनर्वसन करा” – गावकऱ्यांची आर्त हाक
“अशीच परिस्थिती कायम राहिली तर एक दिवस मलकापूर गाव नकाशावरूनच नाहीसे होईल. मध्यरात्री अचानक पूर आल्यास झोपेतच जीव गमवावा लागेल,” अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मलकापूर गावाचे तातडीने सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी गावकऱ्यांनी एकमुखाने केली आहे.
२०२१ नंतर वाढले संकट…..
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये साखळी धरण प्रकल्प उभारल्यानंतर बॅकवॉटरची समस्या तीव्र झाली आहे. धरण होण्यापूर्वी एवढ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यात नदीकाठच्या जमिनींमध्ये पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती पाहणी
या गंभीर परिस्थितीची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मलकापूर गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. मात्र अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना किंवा पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या….
💮मलकापूर गावाचे तातडीने पुनर्वसन करावे.
💮नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी.
💮बॅकवॉटरचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना कराव्यात.
💮पूरस्थितीत गावांचा संपर्क तुटू नये यासाठी उंच पूल व पर्यायी रस्त्यांची उभारणी करावी.
💮दरवर्षी होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
या संपूर्ण परिस्थितीची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दूरध्वनीद्वारे आमदार प्रतापदादा अडसड यांनाही दिली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
