छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी.विजयकुमार मोकळे….ग्रामीण आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल वेळेत मिळावे, यासाठी घरकुलासाठी आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच बांधकामासाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी महसूल व ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम., समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (ग्रामीण विकास यंत्रणा) वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या जागेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांची यादी, जागा, आराखडा आणि आवश्यक कागदपत्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे घरकुल मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय किंवा गायरान जमिनीवरील घरांबाबत शासन निर्णयानुसार नियमानुकूल कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्यासही त्यांनी सांगितले. वनविभागाच्या अखत्यारितील जमिनींसाठी आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून संबंधित मंजुरीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी आवश्यक असलेली पाच ब्रास मोफत वाळू त्यांच्या घराजवळील शासकीय वाळू डेपोतून उपलब्ध करून देण्यासाठी महसूल आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी आणि येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रस्तावांमधील त्रुटी मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित दूर करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसाठी आवश्यक प्रस्ताव पाठवावेत. जिल्ह्यातील आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम स्वरूपात सर्व यंत्रणांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांनी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन आणि ग्रामविकास विभागाने परस्पर समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम. यांनी ‘नशामुक्त अभियान’, ‘बालविवाह मुक्त संभाजीनगर’ आणि ‘कुपोषणमुक्त बालक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोलीस, उत्पादन शुल्क, महिला व बालविकास, महसूल आणि ग्रामविकास विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात घरकुलांसाठी मंजूर झालेल्या गायरान जमिनी ग्रामपंचायतींच्या नावे हस्तांतरित करण्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम. यांच्याकडे सुपूर्द केले.
