अंजनवतीतील दोन सख्ख्या भावांची घरे जमीनदोस्त; मुलगी जखमी, लाखोंचे नुकसान
बीड प्रतिनिधी, दि. ९ जून : खरीप हंगामाच्या तोंडावरच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. मंगळवारी सायंकाळी चारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अंजनवती गावातील दोन सख्ख्या शेतकरी भावांची घरे पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत एका मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठी जीवितहानी मात्र थोडक्यात टळली.
गावातील पंजाब स्वामी येडे आणि पंढरी स्वामी येडे या शेतकरी भावांची घरे पावसाच्या तडाख्यात कोसळली. घर कोसळत असताना कुटुंबीय घरातच असल्याने एकच गोंधळ उडाला. अचानक भिंती व छप्पर कोसळल्याने कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी बाहेर धावले. या दुर्घटनेत एका मुलीच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरामध्ये साठवून ठेवलेले सुमारे १५ कट्टे तूर, ५ ते ६ क्विंटल ज्वारी आणि ९ ते १० क्विंटल गहू मातीखाली दबले गेले. तसेच पलंग, भांडी, दरवाजे, फॅन, टेलिव्हिजन, कूलर, फ्रीजर, विद्युत साहित्य आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे.
घर कोसळल्यामुळे दोन्ही शेतकरी कुटुंबे अक्षरशः उघड्यावर आली आहेत. वर्षभराच्या कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या या शेतकरी कुटुंबांसाठी हे संकट अधिकच गंभीर ठरले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करावा, जखमी मुलीला वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी आणि दोन्ही शेतकरी कुटुंबांना त्वरित आर्थिक सहाय्य जाहीर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“घर गेले, धान्य गेले, संसार उघड्यावर आला” अशी हळहळ व्यक्त करत ग्रामस्थांनी शासनाकडे मदतीची आर्त मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष मदत किती वेगाने पोहोचते, याची कसोटी आता अंजनवतीतील या दुर्घटनेत लागणार आहे.
अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून या दोन्ही कुटुंबांना शासनाकडून तातडीची मदत मिळणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
