आळंदी……संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर येथून वारकरी संप्रदायाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. भक्ती आणि श्रद्धेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या माऊलींच्या मंदिरातील दानपेटीतूनच रोकड चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे ही चोरी मंदिरातील सेवेकऱ्यानेच केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी विशाल बाळू वारूळे या सेवेकऱ्याविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या व्यवस्थापकांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२, १३ आणि १६ मे २०२६ या तीन दिवसांत सायंकाळच्या वेळेत दानपेटीतील रक्कम कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी आरोपी विशालवर होती. दानपेटीतील पैसे बकेटमध्ये भरताना त्याने आजूबाजूच्या लोकांची नजर चुकवत काही रोकड स्वतःच्या पिशवीत टाकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले आहे. या प्रकारात तब्बल १५ हजार रुपयांची रोकड चोरी करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेमुळे आळंदीतील नागरिक, भाविक आणि वारकरी संप्रदायात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, दानपेट्यांची मोजणी प्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
विशेष म्हणजे, माऊलींच्या समाधी परिसरात चोरीच्या घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र प्रशासनाने कठोर पावले उचलली नसल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
भाविकांकडून दानपेटी मोजणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सीसीटीव्ही यंत्रणेचे प्रभावी निरीक्षण आणि सेवेकऱ्यांची नियमित पडताळणी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणामुळे संस्थान कमिटीच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.
