पुणे, दि. १७ मे : शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने आयोजित ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६’च्या समारोप कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुढील वर्षापासून ही स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर,हेमंत रासने यांच्यासह विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल १,२९० अर्ज प्राप्त झाले असून अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधले. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील चार संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी १२ उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत. यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्पर्धेतील विविध नवकल्पनांमध्ये उपग्रह नकाशांकनावर आधारित मृदा परीक्षण, शेतातील ओलावा लक्षात घेऊन स्वयंचलित पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, तसेच तण आणि पीक ओळखून स्वतंत्र फवारणी करणारे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान यांचा समावेश होता. पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ड्रोन आणि उपग्रह नकाशांकनाचा वापर उपयुक्त ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी हवामान बदल, पाण्याची कमतरता, खतटंचाई आणि मजूर समस्यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे सांगितल.
विविध विभागातील विजेते
💮मृदा आरोग्य व व्यवस्थापन : किसान साथी (विजेता), नॅनो वीटा (उपविजेता,)
💮स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन : आयओएच अभियंता समूह (विजेता), फार मोअर (उपविजेता)
💮कृषी यांत्रिकीकरण : एग्रीटेक नेक्सस (विजेता), टीम व्हीएनएमकेव्ही (उपविजेता)
💮कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी : विन विन बाईट्स (विजेता), सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स (उपविजेता)
💮अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन : प्रोटो फीड्स (विजेता), इको एक्सट्रॅक्ट (उपविजेता)
💮पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन : स्मार्ट बायो डिलिव्हरी (विजेता), कृषी नेत्र (उपविजेता)
💮हवामान अनुकूल व डिजिटल शेती : डीप अँग बॉट (विजेता), मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स (उपविजेता)
💮भौगोलिक माहिती प्रणाली आधारित पीक सर्वेक्षण : क्रॉप जेन एआय (विजेता), ग्रीन माइंड्स (उपविजेता)
💮स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता : ई-पिक ऑडिट एआय (विजेता), कृषी प्रबंध (उपविजेता)
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलना भेट देत संशोधक आणि युवा उद्योजकांशी संवाद साधला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील युवकांना नवसंशोधनासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
