२३ पैकी १४ जण सुरक्षित; उर्वरितांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी…मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा मोठा ढीग कोसळून इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, आतापर्यंत १४ जण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित नागरिकांची सुखरूप सुटका करणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
दुर्घटनेनंतर मंत्री महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी महेश लांडगे, शंकर जगताप, रवी लांडगे, डॉ. विजय सूर्यवंशी, विनय कुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री महाजन यांनी सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी वरच्या मजल्यावरील पाच जण स्वतःहून सुरक्षित बाहेर आले, तर बचाव पथकाने सहा जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. आणखी तीन नागरिकांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.
६०० मि.मी.पेक्षा अधिक पावसामुळे दुर्घटना
गेल्या ३० ते ३५ तासांत परिसरात ६०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्याने कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे कचऱ्याचा मोठा लोट इमारतीच्या दिशेने वाहून आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
रात्रभर सुरू राहणार बचाव मोहीम
घटनास्थळी सध्या इमारतीचा मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. जागा अत्यंत कमी असल्यामुळे बचावकार्य अत्यंत सावधगिरीने आणि संथगतीने करावे लागत आहे. आवश्यक असल्यास ही मोहीम रात्रभर आणि सकाळपर्यंतही सुरू ठेवण्यात येणार असून, कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
सुखरूप बाहेर आलेले नागरिक
बचाव पथकाने सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह यांना सुखरूप बाहेर काढले. तर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला हे दुर्घटनेनंतर स्वतःहून सुरक्षित बाहेर पडले. उर्वरित नागरिकांच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू आहे.
